सांगोला तालुक्यातील पाणी, चारा टंचाईबाबत उपाययोजना कराव्यात शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सांगोला-सांगोला तालुक्यातील वाड्या-वस्तीसह अनेक गावात भीषण पाणी व जनावरांचा चारा टंचाई भासत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने सांगोला तहसीलदार यांना देण्यात आले.
सांगोला तालुका व परिसरात २०२३-२४ या वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने सद्य परिस्थितीमध्ये संपूर्ण सांगोला तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरती पाण्याची भीषण टंचाई परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्यस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. विहरीच्या पाण्याने खालची पातळी गाठली आहे. तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्याच्या पाण्यासाठीच्या योजना आहेत त्यासुध्दा नित्याने चालत नाहीत. आज काही गावांमध्ये सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत परंतु त्यास मर्यादा आहेत. प्रशासकीय पातळीवर पाणी टंचाई वर मात करण्यासाठी ताबडतोब योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच गेल्या काही काळात तालुक्यातील पर पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, पावसाच्या अनियमितपणामुळे व कमी प्रमाणामुळे शेती व्यवसाय पूर्णतः अडचणीत आला आहे. पशुधन वाचवण्यासाठी शासन पातळीवर चाऱ्याची व्यवस्था करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अन्यथा याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात लोकशाही मागनि रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, ५ मार्च रोजी तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
निवेदन देताना शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते, विविध दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन व सदस्य, विविध संस्थेचे चेअरमन व संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.