सांगोला शहरास १५ मे पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची माहिती

सांगोला :उन्हाची तीव्रतेसह पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. माण नदीला टेंभुचे पाणी आल्याने नदीवरील १७ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरुन घेण्यचे नियोजन सुरु आहे. सध्या सांगोला शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून १५ मे पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी सांगितले.
सांगोला शहराला पंढरपूर येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. येथील पाणी १५ मे पर्यंत पुरेल एवढेच आहे. पंढरपूर जॅकवेलमधून सांगोल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी २७० अश्वशक्तीची वीज पंप आहे. अशा प्रकारचा वीज पंप वाडेगाव चिंचोली किंवा इतर पाणीपुरवठा योजनेवर नाही. त्यामुळे भविष्यात जेथून पाणीपुरवठा करायचा आहे तेथे जादा अश्वशक्तीचे वीज पंप लावावे लागतील. उजनीतून सोडण्यात येणारे आवर्तन सोडण्यास विलंब झाला तर पाणी कमी पडू शकते त्यामुळे वाड्या वस्त्यावर विहिरी अधिग्रहण करून पाण्याची तहान भागवावी लागेल, असेही गवळी यांनी सांगितले.