
चंद्रपूर, दि. 22 : महानगरपालिका क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पुर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत राज्य शासनाने 23 मार्च 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना जागेचा मालकी पट्टा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि.22) आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख प्रदीप जगताप, उपअधिक्षक- गिज्जेवार, मनपाचे उपायुक्त संदीप चिद्रावार, शुभांगी सुर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महानगरपालिका क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पुर्वीचे अतिक्रमण असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्क पट्टे देण्याचा कार्यक्रम मिशन मोडवर राबवावा. यासाठी 23 मार्च 2026 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना पट्टे द्यायचे आहे, ही सकारात्मकता ठेवून मनपाने नियोजन करावे. नागरिकांना याबाबत अवगत करण्यासाठी वॉर्डांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करावे. यासाठी नगरसेवकांची मदत घ्यावी. तसेच शहरी भागात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात हा विषय प्राधान्याने घ्यावा. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
ज्या लाभार्थ्यांकडे घर टॅक्स पावती किंवा वीज बील किंवा राशनकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा असल्यास त्यांनी अर्जासोबत महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात सादर करावा, असे उपायुक्त संदीप चिद्रावार यांनी सांगितले.



